भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन बीडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात पार पडला.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना सुनेत्रा वहिनी पवार यांनी “सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड” घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देतानाच शेतकरी, क्रीडा, जलसंधारण आणि प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“बीडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे काम करत आहे. या विकासाच्या प्रवासात प्रत्येक बीडकराने साथ द्यावी,” असे आवाहन सुनेत्रा वहिनी पवार यांनी केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना “बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे,” असे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ९६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ७११ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात आणखी पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने १,४५९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून, आतापर्यंत ९ लाख २२ हजार ३६२ बाधित शेतकऱ्यांना ६३४ कोटी रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे वितरित करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या कामगिरीचा उल्लेख करताना सुनेत्रा वहिनी पवार यांनी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. २०२५-२६ मध्ये प्राप्त झालेल्या सुमारे ६ लाख ८८ हजार अर्जांपैकी ९९ टक्क्यांहून अधिक अर्ज वेळेत निकाली काढण्यात आले आहेत.
क्रीडा क्षेत्रासाठीही यावेळी महत्त्वाची घोषणा करण्यात आली. स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असून, बीडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जलसंधारणावर भर देताना “बीडला अधिक समृद्ध, हरित आणि पाणीदार बनवायचे आहे,” असा निर्धार सुनेत्रा वहिनी पवार यांनी व्यक्त केला. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना अधिक गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना पाटोदा तालुक्यातील जरेवाडी जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण देत “बीडमधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्यातून शेतकरी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि जलसंधारणाला प्राधान्य देत बीडच्या विकासाचा संकल्प उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी मांडला. बीडच्या विकासाच्या या प्रवासात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.